हरिश्चंद्रगड Harishchandra gad in Marathi
नाव : हरिश्चंद्रगड
किल्ला उंची : ४६०० फूट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग : माळशेज
जिल्हा : अहमदनगर
चढाई : मध्यम
सद्यस्थिती : चांगली
हरिश्चंद्रगड किल्ला माहिती | Harishchandragad fort information in Marathi
सह्याद्री पर्वत रांगेत घाटमाथ्यावर हरिश्चंद्रगड किल्ला आहे. सह्याद्रीतील काही अतिउंच शिखरे यात प्रदेशात येतात. हरिश्चंद्र तारामती आणि रोहिदास अशा तीन शिखरांचा मिळून हरिश्चंद्रगड किल्ला आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ४६७० फूट केवढे आहे. ऐतिहासिक नैसर्गिक अध्यात्मिक व मंदिर शिल्पांची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी हरिश्चंद्रगड पर्वणी ठरतो. हरिश्चंद्रगड जितका सुंदर आहे त्याही पेक्षा जास्त त्याचा प्रवास रोमांचक आहे.
घनदाट जंगलातून जाणारी नागमोडी पायवाट वाटेत लागणारे कारवी करवंदांचे रान, सोबत करणारे नदी-नाले, उंच कडे, अवघड अजस्त्र खिंडी, क्षणोक्षणी रोमांचित करतात.
हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलामध्ये नाना प्रकारचे पशुपक्षी पाहायला मिळतात, त्यामध्ये कोल्हे,भेकर,तरस,बिबट्या,ससा यासारख्या प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. अशा या हरिश्चंद्रगड किल्ल्याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
गणेश मंदिर |
हरिश्चंद्र गड किल्ला कुठे आहे
हरिश्चंद्रगड किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे.पुणे नगर आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात हरिश्चंद्र गड आहे. माळशेज घाटाच्या डावीकडे व पिंपळगाव जोग धरणाच्या सानिध्यात हा किल्ला आहे.
हरिश्चंद्र गड किल्ल्याचा इतिहास:
हरिश्चंद्रगडाची निर्मिती केव्हा झाली हे जरी सांगता येत नसले तरी या किल्ल्याच्या पोटात असणाऱ्या लेण्यां वरून हा किल्ला अति प्राचीन असावा. हरिश्चंद्र तारामती यांच्या उल्लेखामुळे तो आपल्याला पुराण काळात घेऊन जातो. स्थानिक कथांमधून या किल्ल्याचा संबंध राजा हरिश्चंद्राची जोडला जातो. हरिश्चंद्रगडाचा उल्लेख अग्निपुराण मत्स्यपुराण यासारख्या पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतो. योगिराज संत चांगदेव यांनी हरिश्चंद्रगडावर तपश्चर्या केली, तपश्चर्येनंतर लिहिलेल्या तत्वसार ग्रंथामध्ये हरिश्चंद्रगडाचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आढळते.
हरिश्चंद्रगडाचा इतिहासामध्ये जास्त कुठे उल्लेख आढळत नाही. आदिवासी महादेव कोळी समाजाचे सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये विशेष वर्चस्व होते. त्यामुळे हा किल्ला शेवटपर्यंत महादेव कोळी समाज्या कडे होता. १७४७ मध्ये किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला व किल्ल्याची किल्लेदारी कोळी समाजातील कृष्णाची शिंदे यांच्याकडे दिली. ईस्ट इंडिया कंपनी कडे जाईपर्यंत किल्ला मराठ्यांकडे होता. किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे होते (आद्य क्रांतिकारक रामजी भांगरे) इस १८१८ मध्ये ब्रिटिशांनी किल्ला जिंकून घेतला व किल्ल्यावरील वास्तू नष्ट केल्या.
सूर्योदय |
हरिश्चंद्रगडावर पाहण्यासारखी ठिकाण:
हरिश्चंद्रगड हा भटक्यांची पंढरी म्हणून ओळखला जातो. हा किल्ला ट्रेकर्स ला भरभरून प्रेम देतो.या ठिकाणी ट्रेक ची आवड असणाऱ्या,निसर्ग सौंदर्य, मंदिर, दोन लेणी समूह, आठ शिलालेख आहेत. अशा सगळ्यांनाच हरिश्चंद्र गड पाहण्या सारखा आहे. या किल्ल्याला ताशीव नैसर्गिक कडा असल्याने याला कुठेही तटबंदी पहायला मिळत नाही. गडावरील महत्त्वाच्या ठिकाणांचा आढावा आपण घेऊ.
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर:
हरिश्चंद्रगडावरील मुख्य आकर्षण म्हणजे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर! ते अतिशय सुंदर असून त्याची निर्मिती ९ वर्मा शतकात झाली आहे. मंदिर उंच असून कळसाची उंची साधारण ४०-४५ फूट एवढी आहे.मंदिराच्या प्रासादाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला एक शिलालेख कोरलेला दिसतो.या प्रवेशद्वाराच्या आत मंदिराच्या भिंतीवरील नक्षीकाम लक्ष वेधून घेते. मंदिरा मध्ये शिवलिंग व नंदी आहे. मंदिराच्या मागील बाजूस सात आठ खोल्या काठलेल्या आठळतात.यातील काही खोल्यांमध्ये पाणी असते, पाणी अतिशय थंडगार व मधूर आहे.काही खोल्यांमध्ये मुक्कामाची सोय होऊ शकते.यातीलच एका खोली गुहा असून त्यामध्ये एक चौथरा दिसतो. याच गुहेत चांगदेवांनी तपश्र्चर्या केली होती.त्यांनी या ठिकाणी 'तत्वसार' ग्रंथा लिहून त्यामध्ये हरिश्चंद्रगडाचे सुरेख वर्णन केले आहे.मंदिराच्या पाठी मागिल बाजूस गणपतीचे मंदिर असून यातील गणरायाची मूर्ती अतिशय मनमोहक आहे.याशिवाय प्रांगणात नारायणाचे ही मंदिर पहायला मिळते.
मंदिराच्या भिंती शेजारी पूल असून याच्या खालून तारामती शिखरा वरुन वाहत येणारा ओढा जातो.याला उगमस्थानी मळगंगेचा उगम असे म्हणतात तोच पुढे जाऊन मुळा नदी म्हणून ओळखला जातो.
केदारेश्वराची गुहा | केदारेश्वर लेणी
मळगंगा प्रवाहाच्या दिशेने मळलेल्या वाटेने पुढे गेल्यावर डाव्या बाजूला खडकात खोदलेली गुहा नजरेस पडते. यालाच केदारेश्वराची गुहा किंवा केदारेश्वर लेणी असे म्हणतात. ही खडकांच्या पोटात असून याच्या बाजूच्या भिंतीवर शिला लेख लिहिलेला दिसतो.या लेणी मध्मे मोठे शिवलिंग असून साधारणपणे सहा ते सात फूट उंच व तितकाच त्याचा घेर आहे.या गुहेमध्ये संपूर्ण पाणी भरलेले असून पाणी अतिशय थंड असते.गुहेमध्ये एका बाजूला खोली असून त्या ठिकाणी शिव पूजणाचा प्रसंग रेखाटलेल्या आहे.या लेण्यातील पाणी इतके थंडगार असते की शिवलिंगाचे दर्शन घेउन बाहेर आल्यावर पाय सुन्न पडतात.
हरिश्चंद्रगड गडावरील तारामती शिखर सर्वात उंच शिखर असून याची उंची साधारण ४६६० फूट एवढी आहे.हे शिखर विस्तृत असून याच्या पोटामध्ये सात लेणी खोदलेली आहेत. यांना गणेश लेणी असेही म्हणतात. या लेण्या मध्ये सात ते आठ फूट उंचीची गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. या लेण्यांमध्ये राहण्याची सोय होऊ शकते. इथून डाव्याबाजूला तारामती शिखरावर जाण्याची पायवाट जाते. तारामती शिखरावर जाण्यासाठी लोखंडी शिडी बसवलेली आहे. या पठारावर पाण्याचे टाके आहे. शिखरा वरुन भोवतालचा परिसर अतिशय सुंदर दिसतो.उंच डोंगर सुळके, धुक्याने वेढलेले डोंगर, घाट रस्ता, त्याच प्रमाणे वातावरण स्वच्छ असेल तर भोवतालचे जिवधन, हडसर,चावंड, भैरवगड, रतनगड,अलंग, मदन,कुलंग, कळसूबाई शिखर, नाणेघाट, किल्ले व शिखरे सहज दिसतात.
हरिश्चंद्रगड कोकणकडा:
हरिश्चंद्रगडावरील कोकणकडा ट्रेकर्सना खुणावत असतो त्याचा वैशिष्ट्यपूर्ण आकार कुतूहलाचा विषय आहे. वाटीसारखा खोलगट अर्धवर्तुळाकार ताशीव राकट कडा साधारण दोन किलोमीटर परिघामध्ये पसरलेला आहे. कड्याची खोली पंधराशे फूट असून कड्याच्या टोकाला उभे राहिले असता डोळे गरगर फिरतात. नैसर्गिक सौंदर्य व नयनरम्य सूर्यास्त पाहणाऱ्यांसाठी पर्वणी ठरतो. या ठिकाणी स्वतःला विसरुन जायला होतं. पावसाळ्यात अंगावर येणारे धुके, सोसाट्याचा वारा, ढगांच्या वर डोके काढणारे डोंगर सुळके, घनदाट जंगल या सगळ्यांचा अनुभव घेताना मग अचंबित होते. या ठिकाणावर नेहमी इंद्र व्रज दिसून येतो. कोकण कड्यावरून सूर्यास्ताचा नजर काही औरच दिसतो.
मंदिराच्या बाजूलाच सप्तर्षी पुष्करर्णी तलाव आहे. तलाव अतिशय मोठा असून दगडी चिरां मध्ये बांधकाम केलेले आहे. तलावाच्या काठावर सात आठ खोल्या पाहायला मिळतात या खोल्या सप्तर्षी ऋषींच्या आहेत. या खोल्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या सध्या मात्र मोकळे. त्या खोल्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण पाहायला मिळते. याच्या बाजूने मळगंगेचा प्रवाह वाहतो. त्यामध्ये पाणी असले तरी त्याचा उपयोग पिण्यासाठी होत नाही. तलावाच्या बाजूलाच एक छोटी दगडी बांधकामातील मंदिर पहायला मिळते.
धुक्याने वेढलेला सुळका |
हरिश्चंद्रगड ला जायचे कसे:
हरिश्चंद्र गड़ ला जाण्यासाठी पाच सहा वाटा आहेत,मात्र त्यातील तीन मार्ग प्रचलीत आहेत खिरेश्वर मार्गे तोलार खिंडीतून,दुसरी नळीची वाट, आणि तिसरी सोपी पाचनईची वापर या वाटांबद्दल आपन सविस्तर माहिती जाणून घेऊया.
खिरेश्वर मार्गे:
पुण्याहून येणाऱ्या पर्यटकां साठी खिरेश्वरची वाट जवळची आहे.पुण्याहून माळशेज घाटात खूबी फाट्या पासून डाव्या बाजूला असणाऱ्या पिंपळगाव जोग धरणाच्या पुढे साधारण चार किलोमीटर अंतरावर खिरेश्वर गाव आहे.या वाटेने गडावर जाणारी वाट तोलार खिंडीतून जाते.कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात हा प्रदेश येत असल्याने वाट घनदाट जंगलातून जाणारी आहे.काळकाईचा डोंगर आणि हरिश्चंद्रगड यांच्या मध्ये तोलार खिंड आहे. काळकाई चे शिखराचा महाराष्ट्रातील चार नंबरचे उंच शिखर आहे. डावीकडील वाट हरिश्चंद्रगडावर जाते. तोलार खिंडीतील रॉक पॅच २०० मिटर उंच ४० अंश कोनात सरळ कडा आहे. चढण्यासाठी जागोजागी खाचा व रेलिंग चे खांब आहेत. कडा चढून आल्यावर बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो, मंदिराकडे जाण्यासाठी पायवाटेने सात टेकड्या चढून जाव्या लागतात.दोन तासांच्या ओसाड माळ,झाडी अश्या पायपिटी नंतर मंदिर नजरेस पडते.
पुण्यावरून खिरेश्वर कडे जाण्यासाठी रा.प. महामंडळाची बससेवा सुरू आहे.
हरिश्चंद्रगड नळीची वाट:
कल्याण नगर रोड वरील मुरबाड तालुक्यातील मोरोशी फाट्या वरून डावीकडे आठ किलोमीटर अंतरावर बेलपाडा गाव आहे.बोल पाड्यातून कोकण कड्याच्या बाजूला असणाऱ्या नळीच्या वाटेने गडावर जाता येते.नळीची वाट दोन उंच कड्यांच्या मधून जाणारी अतिशय चिंचोळी वाट आहे. १००० मीटर ची ४० अंश कोणातील चढाई करून मंदिरा पाशी पोहोचण्यासाठी दहा ते बारा तासांचा खडतर ट्रेक करावा लागतो. वाट अतिशय खडतर व निसरडी आहे मोठं मोठाले रॉक पॅच असून ते पार करण्यासाठी दोर असणे आवश्यक आहे. नळीच्या वाटेने जाण्यासाठी जाणकार व्यक्ती बरोबर असावा.
अहमदनगर जिल्ह्यातून हरिश्चंद्रगड ला जाणारी वाट पाहुनी तून जाते. मुंबई नाशिक महामार्गावरील घोटी गावातून राजूर मार्गे पाचनई यावे लागते.पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गडावर जाणारी वाट प्रशस्त व मळलेली पायवाट आहे. तिनं तासांच्या चालीवर मंदिरा पाशी पोहोचतो.
राजूर ते पाचनई हे अंतर तिस किलोमीटर असून या रोड वर रा. प. महामंडळाची बससेवा सुरू आहे.
काय काळजी घ्यावी.
- ट्रेक मोठा असल्याने मुबलक पाणी व स्नॅक्स जवळ ठेवावे.
- जंगलातून प्रवास असल्याने हातात किमान काठी असावी.
- चांगली पकड असणारे बूट पायात असावेत.
- माहित गार व्यक्ती असेल तरच नळीच्या वाटेने ट्रेक करावा.
- गडावर जेवणाची अल्पोपहाराची सोय आहे.
- गडावर टेंट उपलब्ध आहेत.
- गडावरील लेण्या मध्ये मुक्कामाची सोय होऊ शकते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे