वर्धनगड किल्ला | vardhangad fort

वर्धनगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे :

   छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला वर्धनगड किल्ला सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असून सातारच्या ईशान्य दिशेला ३३ किलोमीटर तर कोरेगाव पासून साधारण १४ किलोमीटर अंतरावर आहे.

        किल्ल्या साधारण १६०० फूट उंच असून ट्रेकिंगच्या दृष्टीने सोपा समजला जातो.सह्याद्रीच्या पर्वत रांगेची महादेव डोंगर रांग जी माणदेशातून फिरली आहे तिच्यावर हा किल्ला बांधला आहे.वर्धनगड, महिमानगड, संतोषगडवारुगड हे माणदेशीचे मुख्य किल्ले आहेत.यातील वर्धनगड हा घाटाचा पहारेकरी म्हणून ओळखला जातो.
 

वर्धनगड किल्ला सातारा

       

वर्धनगड किल्ल्याचा इतिहास:

       वर्धनगड कोणत्या कालखंडामध्ये बांधला हे जरी सांगता येत नसले तरी मराठ्यांच्या इतिहासात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
       शिवरायांनी अफझलखानाच्या वधानंतर पन्हाळ्या पर्यंत चा सारा मुलुख स्वराज्यात आणला त्याच वेळी वर्धनगड ही स्वराज्यात आला.१६६१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज वर्धनगड किल्ल्यावर एक महीना मुक्कामी होते.महाराजांनी इ.स. १६७३ - १६७४ मध्ये या किल्लाची पुनर्बांधणी करून किल्ला मजबूत करून घेतला.
 
      छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदाना नंतर औरंगजेब स्वराज्यातील अनेक किल्ल्यावर आक्रमण करून काबीज करत असताना, १ मे १७०१ मध्ये पन्हाळा जिंकून आपला मोर्चा साताऱ्यातील किल्लांकडे वळवला.वर्धनगड हा मोक्याचा किल्ला असल्याने मोगलांचे लक्ष या किल्ल्याला गेले याची खबर किल्लेदालाला लागताच त्याने आपला वकील मोगल सरदार फत्तेउलखान कडे पाठवून 'प्राणाचे अभय मिळत असेल तर आम्ही किल्ला खाली करू' असा संदेश पाठवला.होणारा हल्ला पुढे ढकलून गडाखालील लोकांना गडावर घेणे तसेच दारुगोळा व सैन्याची जुळवाजुळव करून गड झुंजता करणे असा उद्देश होता.

 

    गडावरुन कोणताही संदेश येत नाही किंवा हालचाल ही दिसत नाही. हे पाहून फत्तेउल खानाने किल्ल्यावर हल्ला चढवला त्यास गडावरील मराठ्यांनी चौक उत्तर दिले यामध्ये मोगलांचे बरसने मारले गेले. मोगली सैन्याने गडाखालील वाड्या वस्त्यांना आग लावली त्यामध्ये ४० मराठी लोक पकडण्यात आले. मराठा सैन्याचे ही यावेळी नुकसान झाले होते काही मारले गेले होते तर काही जखम होते. शेवटी 19 जून रोजी मराठ्यांनी वर्धनगड खाली केला.

Vardhangad fort


       मोगलांनी गडावरील संपत्ती जप्त केली त्यामध्ये धान्य तोफा बंदुकीची दारू चाळीस मन सोरा यांचा समावेश होता. किल्ल्यावर मोगली पताका फडकवून किल्ल्याचे नाव सादिकगड असे केले.
 

      सप्टेंबर १७०४ मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला व किल्ल्याचा किल्लेदार किशोर सिंग ला कैद केले परंतु मोगली सैन्याने पुन्हा ऑक्टोबरमध्ये गडावर आपला अंमल बसवला.
       इ.स. १७०७ मध्ये मराठा सैन्याने किल्ला जिंकून घेतला व पुढे इ.स.१८१८ पर्यंत किल्ला मराठा साम्राज्य मध्ये होता. ॲंग्लो मराठा तिसऱ्या युद्ध नंतर तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला.
      

वर्धनगड किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे:

      वर्धनगड गावच्या वेशीवरच दोन तोफा ठेवलेल्या दिसतात. गडाच्या पूर्व दिशेच्या वर्धनगड गावातून गडावर जाण्यासाठी प्रशस्त अशी पायवाट आहे. गडाचे महाद्वार पूर्वाभिमुख असून त्याची अशी रचना केली गेली आहे की कोणाच्याही सहज नजरेस पडणार नाही व दरवाजावर तोफांचा मारा होणार नाही. दरवाजाच्या बाजूलाच शेंदूर फासलेल्या देवाच्या मूर्ती आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत व दरवाजाच्या वरील बाजूस मजबूत असा बुरुज आहे. 

      किल्ल्याची तटबंदी चौफेर असून आजही मजबूत आहे. महाराष्ट्रातील भक्कम व सुस्थितीत तटबंदी असणाऱ्या किल्ल्यांच्या यादीत याचाही समावेश होतो पायर्‍या वर चढून गेल्यानंतर डाव्या बाजूला तटावरून पुसेगाव पर्यंत सारा प्रदेश नजरेस पडतो. गडाच्या मधोमध टेकडीवर  असणारे वरदायिनी माते चे मंदिर लक्ष वेधून घेते. या मंदिराकडे जात असताना  हनुमानाची मूर्ती, महादेवाचे मंदीर व छोटे पाण्याचे टाके वाटेत लागते  मंदिराकडे जाणारी पायवाट चांगलीच मळलेली असून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट लागतात.
    

   वरदायिनी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याने मंदिर आकर्षक दिसते. मंदिरातील देवीची मूर्ती चतुर्भुज असून तिच्या हातामध्ये विविध आयुधे आहेत. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून दगडी बांधकामामुळे आत मध्ये गारवा जाणवतो. मंदिराच्या भोवताली चौथरा बांधलेला आहे.
 

Vardhangad fort
वर्धनगड किल्ला 

   

   किल्ल्यावरून फिरत असताना गडावर ठीक ठिकाणी बांधकामाचे अवशेष व चौथरे पाहायला मिळतात तसेच पाण्याच्या टाक्या. तटबंदीवर जागोजागी बुरुज, जंग्या, ढाल काठी बुरुज, बुरुजा मधील चोर दरवाजा, चुन्या चे घाणे, अशा सार्‍या वस्तू व ऐतिहासिक खुणा पाहायला मिळतात.
      

वर्धनगड ला कसे जावे:

        वर्धनगड किल्ला सातारा पंढरपूर राज्य महामार्गावर असून, सातारा बसस्थानकातून पंढरपूर, गोंदवले, दहिवडी, निढळ ला जाणाऱ्या बसेस वर्धनगड मार्गे जातात. 

      खाजगी वाहन जाणार असाल तर सातारमधील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून कोरेगाव ला जाणाऱ्या रस्त्याने जावे लागते. कोरेगाव पासून पुढे गेल्यानंतर घाट चढून वर गेल्यावर डावीकडेच वर्धनगड गावच्या वेशीवर दोन तोफा ठेवलेल्या दिसतात. तिथून आत मध्ये गडावर जाण्याची वाट आहे.
        फलटण किंवा दहिवडी मार्गे येणाऱ्यांसाठी पुसेगाव वरून वर्धनगड ला जाता येते. पुसेगाव फलटण नियमीत बससेवा सुरू आहे. पुसेगाव ते गड साधारण पाच किलोमीटर आंतर आहे.

काय काळजी घ्यावी:

  •       गडावरील वरदायिनी माता मंदिरात दहा ते पंधरा जणांच्या राहण्याची सोय होऊ शकते.
  •       उन्हाळ्यामध्ये गडावर पाण्याची सोय नसल्याने पाणी बरोबर घेऊन जावे.
  •       गड पाहण्यासाठी दोन तासाचा अवधी पुरा आहे.
  •       जेवण व नाश्त्याची सोय गडाच्या खाली होऊ शकते.
  •       जवळच असणारे पुसेगाव मधील सेवागिरी महाराज मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकता.




टिप्पण्या